Sunday, December 27, 2015

​​'आम्ही धनगर' - कवितासंग्रह



प्राचीन काळापासून पशुपालन करणारा समाज, वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास घडवणारा समाज, आपल्या पशुपालन या पारंपारिक व्यवसायामुळे सर्वत्र पसरलेला व तेथील भाषेनुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा समाज आणि एवढ्या विविधतेत देखील आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेची एकोप्याने ठेवण करणारा समाज म्हणजेच धनगर समाज ! याच धनगर समाजातील काही महत्वाच्या व्यक्तिरेखा तसेच धनगर समाजाच्या सामाजिक जीवनावर विविध अंगानी रचलेल्या कवितांचा सचित्रसंग्रह म्हणजेच 'आम्ही धनगर'.

'ज्ञानकुंज प्रकाशन'तर्फे प्रकाशित 'आम्ही धनगर' या कवितासंग्रहात धनगर समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच ऐतिहासिक गोष्टींना प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर कवितासंग्रहामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, वीरांगना भीमाबाई होळकर, वीर शिंग्रोबा धनगर तसेच बापू बिरू वाटेगावकर यांच्यावरील कवितांचा समावेश आहे. धनगर समाजाचे प्रमुख कुलदैवत श्री खंडोबा यांच्यावरील दोन कविता देखील वाचकांना नक्की आवडतील. त्याचबरोबर धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या सामाजिक जीवनावरील काही कवितांचा समावेशही 'आम्ही धनगर' मध्ये करण्यात आला.      

  • पुस्तक - आम्ही धनगर     
  • कवी - मिलिंद डोंबाळे     
  • प्रकाशक - ज्ञानकुंज प्रकाशन     
  • भाषा - मराठी     
  • साहित्यप्रकार - कवितासंग्रह     ​
  • पृष्ठसंख्या - ८०​
  • स्वागतमुल्य - रु.१००/-

​वाचकांनी सदर कवितासंग्रह घरपोच मिळवण्यासाठी (+९१) ९४०४३५०५२८ / (+९१) ८९७५४९३५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर 'आम्ही धनगर' हा कवितासंग्रह 'BookGanga' वरदेखील पुढील संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे - http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4743727610679215563?BookName=Amhi-Dhangar 

- मिलिंद डोंबाळे​

Thursday, December 24, 2015

​चित्रपट 'बाजीराव मस्तानी' आणि माहेश्वरचा 'अहिल्या फोर्ट'…



१८ डिसेंबर २०१५ रोजी 'बाजीराव मस्तानी' हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. मराठीतील प्रसिध्द लेखक ना.स.इनामदार यांच्या 'राऊ' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट प्रकाशनापूर्वी तसेच प्रकाशनानंतर ही अनेक कारणांनी प्रकाश झोतात राहिला.

सदर चित्रपटात बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यातील नात्याचाही उल्लेख एका दृश्यामध्ये दाखविण्यात आला आहेच. पण ह्या व्यतिरिक्तही एके ठिकाणी अहिल्यादेवींनी उभारलेल्या माहेश्वर येथील किल्ल्याचे 'अहिल्या फोर्ट'चे दृश्यही (थोडेसे बदल करुन) चित्रपटात पहावयास मिळते. चित्रपटात बुंदेलखंडच्या विजयानंतर बाजीराव पेशवे ज्यावेळी छत्रपतींना भेटावयास निघतात त्यावेळी दाखविण्यात आलेला महाल हा अहिल्यादेवींनी माहेश्वर येथे नर्मदेच्या काठावर उभारलेला 'अहिल्या फोर्ट' आहे.

या आधीही अनेक हिंदी तसेच तमिळ मधील चित्रपटांचे तसेच मालिकांचीही अनेक दृश्ये अहिल्यादेवींनी उभारलेल्या माहेश्वर येथील किल्ल्यात 'अहिल्या फोर्ट' येथे चित्रित करण्यात आली आहेतच. इतक्या वर्षांनंतर देखील होळकरशाहीच्या वैभवशाली ऐतिहासिक वास्तूंची लोकांना अशा अनेक माध्यमांतून प्रचीती मिळत राहणे ही आनंदाचीच बाब आहे. 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)​