Friday, August 28, 2015

मल्हारतंत्र



श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचा सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा अर्थात 'मल्हारतंत्र' ! 'सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा', ‘होळकरांचा-गनिमीकावा', 'होळकरी-कावा' किंवा 'मल्हारतंत्र' अशा अनेक नावांनी परिचित असलेला गनिमीकाव्याचा हा प्रकार 'मल्हारतंत्र' या नावानेच जास्त ओळखीचा आहे.

मल्हारबांच्या घोड्यांच्या टापांनी जवळपास अवघा भारत पिंजून काढला. मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे गरुडस्तंभ ठरलेल्या मल्हाररावांनी अनेक युद्धात हेच तंत्र वापरले. दिल्लीच्या तख्तावर वर्चस्व ठेवले. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही पुढे याचाच वापर केला. मॉन्सनचा भीषण पराभव हे देखील याचेच उदाहरण !

होळकरांच्या या तंत्राविषयी प्रसिद्ध इतिहासकार श्री. यशवंत वासुदेव खरे (ऐतिहासिक लेख संग्रह - १५) लिहितात  -  “होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता.  मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...” (सदर पुरावा उपलब्ध करून दिला तो आमचे पुणे स्थित मित्र सचिन शेंडगे यांनी…)

प्रसिध्द इतिहास संशोधक व लेखक श्री. संजय सोनवणी यांचे देखील मल्हारतंत्राविषयी मत आपण जाणून घेऊयात, त्यांच्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या त्यांच्या प्रकाशित लेखामध्ये ते लिहितात - "मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली."

तसेच श्री. संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरीत्र पुस्तकात ते लिहितात - "यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो हे खोटे आहे, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. मॉन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा खरेतर होळकरी-काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युध्दशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पाळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून, भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत न्हेत कसे संपवावे, याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारां पेक्षाही अधिक ठार झाले."

तरी देखील गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ?

- मिलिंद डोंबाळे
www.milind-dombale.blogspot.com

Saturday, August 22, 2015

रायसीना-ग्राम और होलकर राजवंश

"इंदौर राज्य के होलकर राजवंश के १९११ तक के दस्तवेजोंसे यह ज्ञात होता है की दिल्ली का रायसीना ग्राम इंदौर राज्य के मालकी में सन १९११ तक था। सन १९११ में ही होलकर नरेशने इस रायसीना ग्रामको ब्रिटिश सरकार के अतीथ सोपा और आज हमारा राष्ट्रपती-भवन, संसद-भवन, सेक्रेट्रिएट की भव्य वास्तू हमारे इंदौर के होलकरोंके रायसीना ग्रामपर ही स्थापित है।"

- श्री. सुनील गणेश मतकर, 
संदर्भ- 'फुटी कोठी', आयुष अगरवाल द्वारा सन २०१४ में बनाई गई डॉक्युमेंट्री  

श्री. सुनील गणेश मतकर यह प्रसिध्द इतिहासकार डॉ. गणेश मतकरजी के पुत्र है। डॉ. गणेश मतकरजी ने 'होलकर राजवंश का २२० वर्षों का सांस्कृतिक, साहित्यिक और वाङ्ग्मयीन इतिहास' इस विषयपर सन १९९४ में प्रबंध लिखा और उसके लिए उन्हें डॉक्टरेट पदवी प्राप्त है। 

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com

Wednesday, August 12, 2015

आषाढ अमावास्या (गटारी अमावास्या)

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणारी अमावास्या 'आषाढ अमावास्या' म्हणून सर्वत्र ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात विविध नावांनी व विविध प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. 
 
आषाढ अमावास्या ​कर्नाटकात 'भिमाना अमावास्या', आंध्रप्रदेशात 'चुक्कला अमावास्या', तामिळनाडू मध्ये 'चुक्कला अमावास्या व्रतम' या नावांनी साजरी केली जाते. गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच हिमाचल प्रदेश मध्ये हा दिवस 'हरियाली अमावस' म्हणून साजरा केला जातो. कर्नाटकात या दिवशी 'ज्योतीभिमेश्वर व्रत' तसेच 'पती-संजीवनी व्रत' पाळण्यात येतात तर उत्तर भारतातील काही शहरांत या दिवशी यात्रांचे आयोजनही करण्यात येते. तसेच काही ठिकाणी पितृपूजेसाठी हा दिवस शुभ मानला जातो तर काही ठिकाणी या दिवशी 'दिप पूजा' व 'पंच-महाभूत पूजा' केली जाते.
 
महाराष्ट्रात हा दिवस गटारी अमावास्या म्हणून साजरा करण्यात येतो. आषाढ अमावास्येनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश लोक मांसाहार तसेच दारु सेवन वर्ज्य करतात. वैद्यकीयदृष्ट्या देखील ही गोष्ट योग्य मानली गेली आहे. श्रावण महिन्यात मान्सून (पावसाला) जोमात असतो व मानवी शरीरही अधिक संवेदनाक्षम असते, त्यामुळे जड (मांसाहार) आहार तसेच दारु सेवन वर्ज्य करणे आरोग्यासाठी फायदयाचेच ठरते. काही लोक आहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पूर्ण महिनाभर उपवास धरतात व हलक्या उपवासाच्या पदार्थांचेच सेवन करतात. पुढील महिनाभर मांसाहार व दारु सेवन वर्ज्य करावयाचे असल्यामुळे लोक या दिवशी अधिक प्रमाणात मांसाहार व दारु सेवन करुन हा दिवस साजरा करतात.
 
आषाढ अमावास्येच्या दिवशी लोक मांसाहार व दारु सेवन करुन 'त्याला' (श्रावण महिन्यात अनिष्ट मानल्या गेलेल्या आहाराला) पुढील महिनाभरासाठी निरोप देतात व श्रावण महिन्याच्या स्वागताला सज्ज होतात. गटारी अर्थात मांसाहार व दारु यांचे सेवन महिनाभरासाठी वर्ज्य करणे व अनिष्ट घटकांचे शरीरातून निःसारण करणे होय आणि म्हणूनच आषाढ अमावास्येला महाराष्ट्रात 'गटारी अमावास्या' म्हणून संबोधले व साजरे केले जाते.
 
(टिप - वरील सर्व माहिती विविध वेबसाईटसवर प्रकाशित झालेल्या लेखांमधून संकलित करण्यात आली आहे.)
 
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
गुरुवार, दि - १३ ऑगस्ट २०१५

Monday, August 10, 2015

​'धनगर समाज-प्रबोधन' की 'सामाजिक-द्वेष' ?

आजकाल धनगर समाजातील अनेक बुद्धीजीवी तरुण समाज-प्रबोधनाकडे वळत आहेत व धनगर समाजाला जागे करण्याचा मनस्वी प्रयत्नही करत आहेत. सदरचे समाज-प्रबोधन हि काळाची गरज आहे यात काहीच शंका नाही. परंतू समाज-प्रबोधन करीत असताना धनगर समाज-प्रबोधनापेक्षा इतर समाजाप्रती / धर्मांप्रती द्वेषभावना पसरवण्यातच काहींना जास्त रस असल्याचे त्यांच्या लिखानावरुन जाणवते किंवा स्पष्ट होते. त्याचीच प्रचीती म्हणून 'धनगर विरुद्ध मराठा', 'धनगर विरुद्ध ब्राह्मण' तसेच 'धनगर विरुद्ध आदिवासी' हे व असे अनेक विषय रोज सर्रास वाचण्यास मिळतात. 

धनगर समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचे सर्वच्या सर्व खापर ब्राह्मण समाजावर टाकून आपला धनगर समाज काळाच्या फार पाठीमागे राहिला, असे सांगत आमचे काही 'प्रबोधनकार' मित्र धन्यता मानतात. तर काही 'प्रबोधनकार' मित्र राजकीय मागासलेपणाचे सर्व खापर मराठा समाजावर टाकून विषयातून आपले हात पद्धतशीरपणे काढून घेतात. स्वतःच्या समाजाच्या चुकींवर पडदा टाकून त्या गोष्टींसाठी इतर समाजाला दोषी ठरवणे हे कितपत योग्य आहे ? याला समाज प्रबोधन म्हणावे का ?  

अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास धनगर समाजास ब्राह्मणांनी रोखले होते का ? किंवा राजकारणात संघटीत होण्यासाठी धनगर समाजास मराठा समाजाने रोखले होते ? धनगर समाजाच्या मागासलेपणास अंशता इतर समाज कारणीभूत असतीलही, पण मुख्यत्वे ह्या सर्व गोष्टींसाठी धनगर समाजच स्वतः कारणीभूत आहे, हे एक कटूसत्य आहे. माझ्या मते कोणत्याही समाजाच्या अधोगतीला किंवा सामाजिक मागासलेपणाला इतर समाजापेक्षा / धर्मांपेक्षा स्वतः तो समाजच मुख्यत्वे कारणीभूत असतो. धनगर समाजाच्या बाबतीतही असेच काहीसे आहे.

माझ्या मते धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय मागासलेपणाची प्रमुख सहा कारणे आहेत, ती खालीलप्रमाणे; 
१. अशिक्षितपणा 
२. सामाजिक आणि राजकीय असंघटीतपणा 
३. अंधश्रद्धेवरील 'श्रद्धा' 
४. पारंपारिक व्यवसायामध्ये आधुनिकीकरणाचा अभाव 
५. सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीबाबतची उदासीनता 
६. स्वतःच्या गौरवशाली इतिहासाबाबतची उदासीनता

वरील प्रमुख सहा मुद्यांवर मात करुन धनगर समाज नक्कीच प्रगतीपथाकडे झेपावेल यात काहीच शंका नाही. हे सर्व प्रश्नं सोडविण्यासाठी धनगर समाजाने इतर समाजांवर आरोप न करता स्वपरीक्षण करून संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे, तर आणि तरच धनगर समाज स्वतःच्या गौरवशाली इतिहासाची पुनुरावृत्ती करु शकेल. या कार्यात समाजातील बुद्धीजीवी प्रबोधनकारांकडून सकारात्मक मदतीची अपेक्षा करतो आणि धनगर समाजाच्या पुढील 'संघटीत' वाटचालीस शुभेच्छा देतो.

आता, उदाहरणासाठी आपण ब्राह्मण समाजाचा विचार करु. भारतीय लोकसंख्येत जवळपास फक्त ३% असणारा ब्राह्मण समाज आज भारताचा प्रधानमंत्री बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो याचे कारण काय असू शकेल ? कारण तो सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्या संघटीत आहे, साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. सामाजिक प्रश्नांसाठी सर्व समाज एक होतो. तसेच त्या समाजातील बुद्धीजीवी लोकांकडून त्यांच्या संघटना अतिशय प्रभावीपणे चालवल्या जातात. 

तेच महाराष्ट्रात १७% लोकसंख्या असलेला धनगर समाज राज्यातून एक खासदार निवडून आणून देऊ शकत नाही, याचे कारण काय असू शकेल ? धनगरांचे अनेक प्रश्न इतकी वर्षे प्रलंबित का ? तसेच अनुसूचित जमातीमधील अंमलबजावणी असेल किंवा सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाचा मुद्दा असेल किंवा चराऊ कुरणांचा प्रलंबित मुद्दा असेल किंवा असे इतर अनेक… इतकी वर्षे सर्वच मुद्दे अनूत्तरित आहेत. याला कारणीभूत कोण ? धनगर समाजातील संघतीटपणा आणि सुशिक्षितपणा (नुसते शिक्षण नव्हे) यांचा अभाव ही ह्या मागील प्रमुख करणे असू शकतील, असे माझे वयक्तिक मत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकासाचे प्रमुख तीन मुद्दे सांगितले, ते असे - 'शिक्षण, संघर्ष आणि संघटन'. पण आपण त्यातील दोन मुद्दे (शिक्षण आणि संघटन) सोडून फक्त एका मुद्द्यानेच (संघर्ष) परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे यश मिळण्याची आशा तशी धुसर आहे. म्हणूनच धनगर समाजाने शिक्षण, संघर्ष आणि संघटन या तिन्ही मुद्द्यांसमवेत विकासाची ओढ धरावी. विजय नक्कीच आपला असेल.

धनगर समाजाच्या इतिहासाप्रती उदासीनतेवरही चर्चा होणे गरजेचे आहे. खऱ्या इतिहासाच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष किंवा मराठाद्वेष पसरवण्याच्या घटनांची संपूर्ण महाराष्ट्राने याआधी दखल घेतलेलीच आहे. वाघ्या कुत्र्याचा मुद्दा असेल किंवा अहिल्यादेवींची तसेच तुकोजीराव होळकरांची बदनामी ही त्यातीलच काही निवडक उदाहरणे ! त्यामुळे खऱ्या इतिहासाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या सामाजिकद्वेषाचा धनगर समाज बांधवांनी स्वतःच्या विवेक बुद्धीने विचार व पडताळणी करावी ही विनंती.

जय हिंद ! जय मल्हार !  

मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०१५