Tuesday, December 10, 2013

एक प्रभावी उपदेश...


जागतिक इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका अशी ​नोंद असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या एका प्रभावी उपदेशाचे उदाहरण येथे देत आहे.

महाराष्ट्रातील संगमनेर मधील कवी अनंत फंदी, हे कविता तसेच तमाशा करण्यात अतिशय कुशल  होते. कला सादर करण्याच्या हेतूने एकदा आनंद फंदी व त्यांचे सहकारी होळकरशाहीत महेश्वरला गेले. अहिल्यादेवींच्या कार्यकाळात राजवाड्यात तमाशे किंवा तत्सम कार्यक्रम केले जात नव्हते, परंतू विन्मुख कोणी जाऊ नये म्हणून अनंत फंदी व त्यांच्या सहकाऱ्यांना परवानगी देण्यात आली. अनंत फंदी यांनी स्वतः रचलेले कवन अहिल्यादेवींच्या दरबारात सादर केले. अहिल्यादेवींनी संपूर्ण कवन ऐकले आणि अनंत फंदी यांना एक उपदेश दिला की, "तुम्ही ब्राह्मण असून अशा कर्मात कवित्व बुद्धी खर्च करितां त्यापेक्षा हीच कविता परमार्थ साधेल अशा तऱ्हेने कराल तर आपल्याबरोबर अन्य जनांचे हित होईल" या उपदेशावरून अहिल्यादेवींची परमार्थ विचारसरणी तर दिसतेच, पण हा सदुपदेश ऐकून अनंत फंदींची विचार मात्र पालटला. त्यांनी हाती असलेल्या डफाच्या कड्यावर तत्काळ बुक्की मारून ते कडे फोडले आणि पुढे कधी तमाशा न करण्याची प्रतिज्ञा घेतली. स्वतःची चूक उमगल्याने त्यांनी बिदागी स्वीकारण्यासही नकार दर्शविला व सहकाऱ्यांसह संगमनेरी परतले.

बरेच दिवस लोटले, अनंत फंदींचे तमाशे बंदच होते. संगमनेर गावात अनंतस्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वार्षिक उत्सव होत असे. त्या उत्सवात तमाशा करण्यासाठी तेथील गाव-पाटील व सर्व गावकऱ्यांनी  अनंत फंदींना अतिशय आग्रह केला. कदाचित आपण घेतलेल्या प्रतिज्ञेचा विसर पडल्याने त्यांनी त्यांच्या आग्राहाला मान देऊन उत्सवात तमाशा परत सुरु केला. परत फंदींचे तमाशे चालू लागले. तोच एके दिवशी अहिल्यादेवींची स्वारी पुण्यास जातेवेळी  संगमनेर येथे पोहोचली. रस्त्याच्या बाजूला लोकांची गर्दी पाहून अहिल्यादेवींनी तपास केला. अनंत फंदी यांचा तमाशा सुरु असल्याचे कळाले. अहिल्यादेवींनी त्या तमाशाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. अहिल्यादेवींची स्वारी आपल्याकडे येत आहे याची माहिती माहिती आनंत फंदींना मिळाली. त्यांना आपण पूर्वी अहिल्यादेवींसमोर घेतलेल्या प्रतिज्ञेची आठवण झाली. भितीने अनंत फंदी यांनी पुढील नर्तकांस खाली बसवले, मागे उभ्या असलेल्यांपैकी एकाला टाळ घेऊन उभे केले आणि एका सुंदर कीर्तनाला सुरुवात केली 'हरी तुझी मुरली घरघेणी…' तेवढ्यात अहिल्यादेवी तेथे पोहोचल्या, अहिल्यादेवींनीही कीर्तन पूर्ण ऐकले. कीर्तन संपताच अहिल्यादेवींनी अनंत फंदीचे कौतुक तर केलेच पण त्यांच्या किर्तनावर खुश होऊन त्यांना एक भरजरी पोषाख व सुवर्णाची कडी इनाम म्हणून दिली. इनाम देऊन देवींची स्वारी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. स्वारी गेल्यानंतर मात्र, अनंत फंदींनी अहिल्यादेवींचा 'तो' उपदेश व आपण करत असलेले कृती याचा विचार केला आणि स्वतःवर राग येउन त्यांनी तमाशाचा नाद कायमचा सोडला तो सोडलाच. जणू नियतीने अहिल्यादेवींच्या हाथूनच अनंत फंदींचे मत परिवर्तन व त्यांना समाज प्रबोधनाच्या मार्गावर आणण्याचे लिहून ठेवले होते. त्यानंतर मात्र ह्या कवीने प्रबोधनात्मक आणि उपदेशात्मक रचनेलाच महत्व दिले. त्यांनी कविता, पोवाडे ह्या साहित्य प्रकारांमध्ये अनेक साहित्य रचले. पुढे जाऊन याच कवीने समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणाऱ्या काव्यप्रकाराचे, अर्थात 'फटका' ह्या नवीन काव्यप्रकाराची सुरवात करून जणू अहिल्यादेवींच्या 'त्या' उपदेशाचे जीवनभर पालन केले. 'अनंत फंदींचे फटके' हे सर्वांना परिचयाचे आहेतच. त्यातील सर्वात गाजलेला म्हणजे - "बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको, संसारामधी ऐसा आपला, उगाच भटकत फिरु नको …"

सदैव लोककल्याणाचा विचार मनी असणाऱ्या अहिल्यादेवींच्या उपदेशांनी तसेच कृतींनी कित्तेकांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. त्यातीलच हे एक उदाहरण...

धन्यवाद
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
संदर्भ - 'अनंत फंदी यांच्या कविता व लावण्या', मुद्रक- रा. रा. शंकर नरहर जोशी, १९२१. 

Saturday, December 7, 2013

पुण्यश्लोक अहिल्यादेवी - श्री. रणवीर रजपूत

पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील सदर लेख श्री. रणवीर रजपूत (वरिष्ठ सहाय्यक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, महाराष्ट्र) यांनी लिहिला असून, इंटरनेट वरील एका साईटच्या मदतीमुळे आज वाचनात आला. तो येथे श्री. रणवीर रजपूत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपलब्ध करून देत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी :

राजकारण, समाजकारण आणि धर्मपरायण या क्षेत्रात परमोच्च शिखर गाठणार्या तसेच शुद्धचारित्र्य सात्विक आचारविचार व चोख कारभार यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून लौकीक संपादन केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या या लौकीकाबद्द्लच पुण्यश्लोक असे म्हटले जाते. अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थ क्षेत्रांच्या जीर्णोद्धारासाठी झटत असताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून रामेश्वरापर्यंत व जगन्नाथपुरीपासून सोमानथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहीरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यांवर सर्वप्रथम घाट बांधून नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.

अहिल्यादेवींच्या उज्ज्वल कामगिरीबद्दल कवयित्री शांता शेळके म्हणतात,
राजयोगिनी सती अहिल्या, होळकरांची |
अजून नर्मदा जळी लहरती, तिच्या यशाची गाणी ||
परधर्माविषयी त्यांच्या मनात सहिष्णूता व आदर होता. त्यामुळेच अहिल्यादेवींच्या राज्यात सर्वधर्मिय लोक आनंदाने व सुखाने नांदले. परराज्यांशी त्यांनी सलोख्याचे व परस्पर सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळेच निजाम, हैदर, टिपू, नबाब हे त्यांच्याविषयी आदर बाळगून होते.

वैधव्याच्या दुःखाने आणि पुत्रशोकाने होरपळून निघालेल्या या कर्तृत्ववान व धाडसी महिलेने धीरोदात्तपणे निधड्या अंतःकरणाने पुनश्च उभे राहून मध्य भारतात मराठी साम्राज्याच्या ध्वज फडकत ठेवला. पतीनिधनानंतर अहिल्याबाई सती जायला निघाल्या होत्या. पण सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांची समजूत घालून या निर्णयापासून त्याना रोखले. त्यानंतर अहिल्याबाईंनी सासऱ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून उर्वरित आयुष्य दौलतीचा सांभाळ व जनहित कार्यात व्यतीत केले. १७६६ मध्ये मल्हाररावांच्या निधनानंतर नर्मदाकाठी महेश्वर येथे राजधानी स्थापित करून त्यांनी येथूनच राज्यकारभाराची सूत्रे समर्थपणे चालवली. उत्तम प्रशासक म्हणून नावलौकीक मिळवला.

अहिल्याबाईंनी सैनिकी शिक्षणही घेतले होते. त्या उत्तम लढवय्या होत्या. सैनिकांचे मनोधैर्य टिकवून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी त्या नेहमी सैन्यदलाला भेटी देत असत. त्यांनी सैन्यात महिलांची एक तुकडीही ठेवली होती. पेशव्यांवर त्यांची अपार निष्ठा होती. माधवराव, सवाई माधवराव, नाना फडणीस यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. मराठी राज्याच्या इतिहास लिहिणारे जॉन माल्कम म्हणतात, अहिल्यादेवींनी अंतर्गत राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावी एवढी नमुनेदार होती. ती एक विशुद्ध अंतःकरणाची आदर्श राज्यकर्ती होती.

पुरोगामी विचारसरणी असलेल्या अहिल्यादेवींनी कालबाह्य झालेल्या पूर्वीच्या अनेक कायद्यांमध्ये परिस्थितीनुरूप सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. विधवांचे धन जप्त करून ते राजकोषात जमा करण्याची जुलमी प्रथा बंद केली. विधवेला मुल दत्तक घेण्याची इच्छा असल्यास तिला तशी परवानगी देण्यात आली. या न्यायिक प्रक्रियेच्या आड येणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिली जाईल, असे फर्मान काढले होते. अहिल्यादेवींनी जवळपास २८ वर्षे राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळली. मल्हाररावांच्या काळात राज्याचे वार्षिक उत्पन्न सोळा लाक रूपये होते. अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत ते एक कोटींपर्यंत गेले. त्या राजकारणाबरोबरच अर्थकारणातही पारंगत होत्या. गावोगावी लोकांना जागीच न्याय मिळावा म्हणून पंचाधिकारी नेमले. भिंड, गोंड जमातीच्या लोकांकडून त्यांनी पडीक जमिनीवर लागडव करून राज्यकोषात भर टाकली. प्रजेकडून कर रूपाने प्राप्त झालेला पैसा जनकल्याणाच्या विविध उपक्रमांसाठी राबवून प्रजेला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी सारं आयुष्य वेचलं.

अहिल्यादेवींनी राज्यव्यवस्थेत शिक्षणावर अधिक भर दिला. होळकरांची राजधानी महेश्वर शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. नामवंत व्यक्ती व शैक्षणिक संस्थानांमार्फत शिक्षण दिले जात असे. हिंदी व मराठी पाठशाळेतून संस्कृत भाषेचेही शिक्षण दिले जाई. याशिवाय वेद-पुराण, शास्त्रे, वेदांत व्याकरणाचे शिक्षण विद्वान-पंडितांमार्फत देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांच्या राजदरबारात कलाकार, साहित्यिक, शिल्पकार, पंडितांना विशेष मानसन्मान दिला जात असे. कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना सरकार दरबारी मानाचं स्थान होतं.

देशासाठी त्यांनी केलेल्या गौरवपूर्ण कार्याबद्दल भारत सरकारने या राजमातेच्या स्मरणार्थ कृतज्ञतेच्या भावनेतून अहिल्याबाईंच्या नावाने १९७५ मध्ये टपाल तिकीट काढलं. पंडित नेहरूंनी ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी या आपल्या पुस्तकात हिंदूस्थानातील युद्ध व बंडे या शीर्षकाखालील लेखात अहिल्यादेवींविषयी आदर व्यक्त करताना म्हटले आहे, की मध्य हिंदूस्थानात आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकीक मिळविलेल्या विभूताचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार स्त्रीचा. एका अल्पवयी विधवा स्त्रीने १७६५ ते १७९५ ही तीस वर्षे इंदूर संस्थानावर अधिराज्य केले हे कौतुकास्पद आहे. तिने युद्ध टाळून आपल्या संस्थानात शांतता व सुव्यवस्था राखून भरभराटी आणली. अहिल्यादेवींचे हे महान कार्य सर्वधर्मियांना वंदनीय होतं. म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी असे म्हटले जाते.

स्वतःचे कौटुंबिक जीवन दुःखीकष्टी असतानाही अहिल्यादेवी धीरोदात्तपणे प्रजेच्या सुखशांतीसाठी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कार्यरत राहिल्या. धवलचारित्र्य आणि पावित्र्याची चैतन्यमूर्ती अहिल्यादेवी म्हणजे मानवी जीवनातील अज्ञान, अंधःकार व दुःख करून त्यास प्रकाशमान करणारी दीपज्योत होय.

-रणवीर रजपूत
वरिष्ठ सहाय्यक संचालक,  माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, महाराष्ट्र.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0709/10/1070910011_1.htm

Friday, December 6, 2013

महाराजा यशवंतराव होळकर यांचा शाहीर अनंत फंदी लिखित पोवाडा

सदरचा पोवाडा संगमनेर (अहमदनगर, महाराष्ट्र) येथील शाहीर अनंत फंदी यांनी लिहिला असून, त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या एका जुन्या पुस्तकात तो मला मिळाला. तो वाचकांसाठी मी येथे शाहीर अनंत फंदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत  उपलब्ध करून देत आहे. 


सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥

वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती । भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती । बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥

शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा । मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा । उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा । खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥

सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली । अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली । सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली । तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥

सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती । सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति । बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती । फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी । जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥


सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला । शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्‍हा । मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा । अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥

Monday, December 2, 2013

Samrat Harihara & Bukkaraya (सम्राट हरिहर आणि बुक्काराय)



दक्षिण भारतात सुलतानी आक्रमकांना निस्तेज करणारे, तेराव्या शतकात स्वातंत्र्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे, भारताच्या गौरवशाली इतिहासात अजरामर झालेले, विजयनगर साम्राज्याचे संस्थापक, कुरुबा-धनगर कुलावतंस  सम्राट म्हणजेच सम्राट हरिहर आणि बुक्कराय !
 
संपूर्ण दक्षिण भारतावर सुमारे तीनशेहून अधिक वर्षे राज्य करुन भारतीय इतिहासात एक गौरवशाली सुवर्ण काळ ठरलेले साम्राज्य म्हणजेच - विजयनगर साम्राज्य ! उत्तरेकडील सुलतानांचा धोका ओळखून १३३६ साली दक्षिण भारतात हरिहरराय व बुक्कराय या दोन कुरुबा-धनगर बंधूनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. पुढे जाऊन याच साम्राज्याने संपूर्ण दक्षिण भारतात सुमारे ३१० वर्षे राज्य केले. कला, संस्कृती, साहित्य व स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने आपल्याला इथे पहावयास मिळतात. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले नगर (म्हणजे आत्ताचे कर्नाटक राज्यातील हंपी) आजही त्यावेळच्या वैभवाची साक्ष देतात. या ऐतिहासिक शहराला युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थान' (World Heritage Site) म्हणून घोषित केलेले आहेच. पंधराव्या शतकात भारताच्या भेटीस आलेल्या आणि विजयनगर साम्राज्याला भेट दिलेल्या अनेक पर्यटकांनी देखील येथील वैभवाचे वर्णन नोंद करून ठेवले आहे. साहित्य क्षेत्रात कन्नड, तमिळ, तेलुगू व संस्कृत या भाषांना एक नवी उंची प्राप्त करून देण्यास ह्या साम्राज्याचे मोलाचे योगदान मिळाले. भारतीय इतिहासात आपला एक वेगळा ठसा उमठवणारे, पंधराव्या शतकातील कृष्णदेवराय हे राजाही ह्याच साम्राज्यातील. विजयनगर साम्राज्याबद्दलची काही उपलब्ध माहिती संक्षिप्त स्वरुपात;  
  • साम्राज्य - विजयनगर साम्राज्य 
  • शासनकाळ - १३३६ ते १६४६ 
  • धर्म - हिंदू 
  • भौगोलिक स्थान - दक्षिण भारत 
  • भाषा - कन्नड, तमिळ आणि तेलुगू 
  • राजघराणी - संगमा, सालुव, तुलूव व अरविदू  

राजघराणी, संबधीत राजें आणि त्यांचा कार्यकाल यांची उपलब्ध माहिती खालील प्रमाणे; 

१. संगमा राजघराणे - 
  • हरिहरराय (प्रथम) : १३३६ - १३५६ 
  • बुक्कराय (प्रथम) : १३५६ - १३७७ 
  • हरिहरराय (द्वितीय) : १३७७ - १४०४ 
  • विरूपाक्षराय: १४०४ - १४०५ 
  • बुक्कराय (द्वितीय) : १४०५ - १४०६ 
  • देवराय (प्रथम) : १४०६ - १४२२ 
  • देवराय (द्वितीय) : १४२४ - १४४६ 
  • रामचंद्रराय : १४२२ 
  • वीरविजय बुक्कराय : १४२२ - १४२४ 
  • देवराय (द्वितीय) : १४२४ - १४४६ 
  • मल्लिकार्जूनराय : १४४६ - १४६५ 
  • विरूपाक्षराय (द्वितीय) : १४६५ - १४८५  

२. सालुव राजघराणे - 
  • नरसिंहदेवराय : १४८५ - १४९१ 
  • तिम्मा भुपाला : १४९१ 
  • नरसिंहराय (प्रथम) : १४९१ - १५०५  

३. तुलूव राजघराणे - 
  • नरसानायक : १४९१ - १५०३ 
  • वीरनरसिंहराय : १५०३ - १५०९ 
  • कृष्णदेवराय : १५०९ - १५२९ 
  • अच्युतदेवराय : १५२९ - १५४२ 
  • सदाशिवराय : १५४२ - १५७०  

४. अरविदू राजघराणे - 
  • अलियरामराय : १५४२ - १५६५ 
  • तुरूमलदेवराय : १५६५ - १५७२ 
  • श्रीरंग (प्रथम) : १५७२ - १५८६ 
  • वेंकट (द्वितीय) : १५८६ - १६१४ 
  • श्रीरंग (द्वितीय) : १६१४ 
  • रामदेव : १६१७ - १६३२ 
  • वेंकट (तृतीय) : १६३२ - १६४२ 
  • श्रीरंग (तृतीय) : १६४२ - १६४६  

एवढे गौरवशाली इतिहास भारतात घडून देखील आपण भारतीय मात्र त्याच इतिहासाबद्दल अनभिज्ञ व उदासीन आहोत, हीच खरी शोकांतिका…
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com