Monday, December 2, 2013

Samrat Harihara & Bukkaraya (सम्राट हरिहर आणि बुक्काराय)



दक्षिण भारतात सुलतानी आक्रमकांना निस्तेज करणारे, तेराव्या शतकात स्वातंत्र्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे, भारताच्या गौरवशाली इतिहासात अजरामर झालेले, विजयनगर साम्राज्याचे संस्थापक, कुरुबा-धनगर कुलावतंस  सम्राट म्हणजेच सम्राट हरिहर आणि बुक्कराय !
 
संपूर्ण दक्षिण भारतावर सुमारे तीनशेहून अधिक वर्षे राज्य करुन भारतीय इतिहासात एक गौरवशाली सुवर्ण काळ ठरलेले साम्राज्य म्हणजेच - विजयनगर साम्राज्य ! उत्तरेकडील सुलतानांचा धोका ओळखून १३३६ साली दक्षिण भारतात हरिहरराय व बुक्कराय या दोन कुरुबा-धनगर बंधूनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. पुढे जाऊन याच साम्राज्याने संपूर्ण दक्षिण भारतात सुमारे ३१० वर्षे राज्य केले. कला, संस्कृती, साहित्य व स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने आपल्याला इथे पहावयास मिळतात. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले नगर (म्हणजे आत्ताचे कर्नाटक राज्यातील हंपी) आजही त्यावेळच्या वैभवाची साक्ष देतात. या ऐतिहासिक शहराला युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थान' (World Heritage Site) म्हणून घोषित केलेले आहेच. पंधराव्या शतकात भारताच्या भेटीस आलेल्या आणि विजयनगर साम्राज्याला भेट दिलेल्या अनेक पर्यटकांनी देखील येथील वैभवाचे वर्णन नोंद करून ठेवले आहे. साहित्य क्षेत्रात कन्नड, तमिळ, तेलुगू व संस्कृत या भाषांना एक नवी उंची प्राप्त करून देण्यास ह्या साम्राज्याचे मोलाचे योगदान मिळाले. भारतीय इतिहासात आपला एक वेगळा ठसा उमठवणारे, पंधराव्या शतकातील कृष्णदेवराय हे राजाही ह्याच साम्राज्यातील. विजयनगर साम्राज्याबद्दलची काही उपलब्ध माहिती संक्षिप्त स्वरुपात;  
  • साम्राज्य - विजयनगर साम्राज्य 
  • शासनकाळ - १३३६ ते १६४६ 
  • धर्म - हिंदू 
  • भौगोलिक स्थान - दक्षिण भारत 
  • भाषा - कन्नड, तमिळ आणि तेलुगू 
  • राजघराणी - संगमा, सालुव, तुलूव व अरविदू  

राजघराणी, संबधीत राजें आणि त्यांचा कार्यकाल यांची उपलब्ध माहिती खालील प्रमाणे; 

१. संगमा राजघराणे - 
  • हरिहरराय (प्रथम) : १३३६ - १३५६ 
  • बुक्कराय (प्रथम) : १३५६ - १३७७ 
  • हरिहरराय (द्वितीय) : १३७७ - १४०४ 
  • विरूपाक्षराय: १४०४ - १४०५ 
  • बुक्कराय (द्वितीय) : १४०५ - १४०६ 
  • देवराय (प्रथम) : १४०६ - १४२२ 
  • देवराय (द्वितीय) : १४२४ - १४४६ 
  • रामचंद्रराय : १४२२ 
  • वीरविजय बुक्कराय : १४२२ - १४२४ 
  • देवराय (द्वितीय) : १४२४ - १४४६ 
  • मल्लिकार्जूनराय : १४४६ - १४६५ 
  • विरूपाक्षराय (द्वितीय) : १४६५ - १४८५  

२. सालुव राजघराणे - 
  • नरसिंहदेवराय : १४८५ - १४९१ 
  • तिम्मा भुपाला : १४९१ 
  • नरसिंहराय (प्रथम) : १४९१ - १५०५  

३. तुलूव राजघराणे - 
  • नरसानायक : १४९१ - १५०३ 
  • वीरनरसिंहराय : १५०३ - १५०९ 
  • कृष्णदेवराय : १५०९ - १५२९ 
  • अच्युतदेवराय : १५२९ - १५४२ 
  • सदाशिवराय : १५४२ - १५७०  

४. अरविदू राजघराणे - 
  • अलियरामराय : १५४२ - १५६५ 
  • तुरूमलदेवराय : १५६५ - १५७२ 
  • श्रीरंग (प्रथम) : १५७२ - १५८६ 
  • वेंकट (द्वितीय) : १५८६ - १६१४ 
  • श्रीरंग (द्वितीय) : १६१४ 
  • रामदेव : १६१७ - १६३२ 
  • वेंकट (तृतीय) : १६३२ - १६४२ 
  • श्रीरंग (तृतीय) : १६४२ - १६४६  

एवढे गौरवशाली इतिहास भारतात घडून देखील आपण भारतीय मात्र त्याच इतिहासाबद्दल अनभिज्ञ व उदासीन आहोत, हीच खरी शोकांतिका…
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

No comments:

Post a Comment